क्रीडा

भारताचे आठव्या जेतेपदाचे ध्येय, महिला आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आज श्रीलंकेशी भिडणार

Swapnil S

डम्बुल्ला : गतविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत वर्चस्व गाजवण्याचे ध्येय राखले आहे. भारतीय महिला संघाची अंतिम लढत रविवारी श्रीलंकेशी होणार आहे.

भारताने या स्पर्धेत आतापर्यंत पूर्णपणे हुकूमत राखली आहे. पाकिस्तानचा सात विकेट्सनी, यूएईचा ७८ धावांनी, नेपाळचा ८२ धावांनी तर बांगलादेशचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत भारताने थाटात अंतिम फेरी गाठली आहे. भारताचे अव्वल फलंदाज आणि गोलंदाज आग ओकत असताना, त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढण्याची कोणतीही संधी दिलेली नाही.

सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी धुव्वाधार फलंदाजी केली असून भारताला चांगली सुरुवात करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंग यांनीही गोलंदाजीत उपयुक्त योगदान दिल्यामुळे भारताला सर्व सामने जिंकता आले. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा मान दीप्ती शर्माने पटकावला असून तिच्या नावावर ९ विकेट्स जमा आहेत. त्याचबरोबर रेणुका सिंगने ७ बळी मिळवले आहेत. त्यांना राधा यादव हिचीही चांगली साथ मिळाली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना फलंदाजीची कमी संधी मिळाली असली तरी भारताला त्याची चिंता नाही. हरमनप्रीतला तीन सामन्यापैकी दोन लढतीत मैदानावर उतरण्याची संधी मिळाली असली तरी जेमिमाने तिन्ही सामन्यांत आपली छाप पाडली. दुसरीकडे, श्रीलंका संघही या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. कर्णधार चामरी अथापथूथू हिचा फॉर्म श्रीलंकेसाठी जमेची बाजू ठरली आहे. तिने या स्पर्धेत सर्वाधिक २४३ धावा केल्या आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, संजना संजीवन

श्रीलंका : चामरी अथापथूथू (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अमा कांचना, उदेशिका प्रबोधनी, विश्मी गुणारत्ने, काव्या काविंदी, इनोशी प्रियदर्शनी, सुगंधिका कुमारी, अचिनी कुसासोरिया, कविशा दिलहरी, निलाक्षी डीसिल्वा, साचिनी निसांका, शाशिनी गिमहानी

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला