चेस्टर ली स्ट्रीट : आयर्लंड संघाविरुद्ध नुकताच विश्वविजेत्या भारतीय संघाला टी-२० मालिका गमवावी लागली. यातून सावरण्यासाठी पुरेसा अवधी मिळालेला नसतानाच भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध दोन हात करणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरी लढत शनिवारी मँचेस्टर येथे खेळवण्यात येईल. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. भारताच्या फलंदाजांचा या लढतीत पुन्हा कस लागेल.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मार्चमध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र आता सूर्यकुमारला भारतीय संघातून वगळत भारताने २०२८चा विश्वचषक व ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी भारताच्या टी-२० संघातही नसलेला श्रेयस आता कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज असून श्रेयस व प्रशिक्षक गौतम गंभीर यांची जोडी किती यश मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. २०२४ मध्ये याच कर्णधार-प्रशिक्षकाच्या जोडीने कोलकाताला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते.
दरम्यान, श्रेयसच्या नेतृत्वात पहिल्याच मालिकेत भारताला आयर्लंडकडून ०-२ असा मालिका पराभव पत्करावा लागला. या मालिकेपासून संजू सॅमसन, इशान किशन व तिलक वर्मा यांची सुमार कामगिरी कायम आहे. त्यामुळे १५ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार का, याची चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. आयर्लंडविरुद्ध सूर्यवंशीला पदार्पणाची संधी लाभली नाही.
आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर श्रीलंकेतील तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारत-अ संघाकडून खेळताना वैभवने २९ चेंडूत ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारून पुन्हा लक्ष वेधले.
वेळ : सायंकाळी ७ वाजता; थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी