कोलंबो : भारताचा ३१ वर्षीय चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने संघर्ष करत आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध रविवारपासून रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी कुलदीपला पुन्हा प्राधान्य द्यावे की ऑफस्पिनर सारांश जैनला पदार्पणाची संधी द्यावी, असा पेच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे. कुलदीपने शुक्रवारी सराव करणेही टाळले.
पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीपने दोन डावांत २५ षटके फेकून अवघा एक बळी घेतला होता, तर डावखुरा फिरकीपटू मानव सुथार आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून १४ बळी टिपले. भारताने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला १६५ धावांनी धूळ चारली. कर्णधार शुभमन गिलनेही कुलदीपला तिसरा फिरकी पर्याय म्हणून पाहिले. श्रीलंकेच्या संघात आघाडीच्या फळीत अनेक डावखुरे फलंदाज असल्याने सारांशचा ऑफस्पिनर पर्याय त्यांच्याविरुद्ध प्रभावी पर्याय ठरू शकतो. भारताचे फिरकी प्रशिक्षक साईराज बहुतूले यांनी कुलदीपची पाठराखण केली आहे. “गॉल येथील परिस्थितीमुळे कुलदीपला वेगळी भूमिका बजवावी लागली. तो नेहमीच मॅच-विनर राहिला असून नक्कीच संघ व्यवस्थापनाच्या योजनेत आहे. मऊ झालेल्या कुकाबुरा चेंडूमुळे मनगटी गोलंदाजांना अडचणी येतात,” असे बहुतुले म्हणाले.
या कठीण प्रसंगात भारताचे माजी लेगस्पिनर एल. शिवरामकृष्णन यांनी कुलदीपला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. कसोटीत तीन जवळचे क्षेत्ररक्षक आणि फक्त एक सीमारेषेवर असताना अचूक टप्पा आणि लांबी राखणे अत्यंत आवश्यक असते. वेगाने गोलंदाजी करण्याचा सल्ला हा कुलदीपला मिळालेला सर्वात वाईट सल्ला आहे, असे सांगत शिवरामकृष्णन यांनी त्याला स्वतःच्या शैलीवर आणि नैसर्गिक वेगावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता कुलदीप कामगिरी उंचावणार का, हे पाहणे रंजक ठरेल.