नवी दिल्ली : भारतीय महिला फुटबॉल संघ २०२६मध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०२७च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी ही स्पर्धा पात्रतेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे.
भारताने पात्रता फेरीतील ब-गटात सलग चार सामने जिंकून अग्रस्थान काबिज केले. थायलंड, इराक, मोंगोलिया व टिमोर या देशांना भारताने नमवले. त्यामुळे आता आशियाई चषक स्पर्धेतही भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.
एकीकडे मानोलो मार्क्वेझ यांनी भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषकाला पात्र ठरण्यापासून फार दूर आहे. तसेच सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतर भारताची अवस्था आणखी बिकट झाली आहे. मात्र महिला संघाने पात्रतेच्या जवळ मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ २०२७च्या विश्वचषकास पात्र ठरू शकतो.