बर्मिंघम : इंग्लंडविरुद्ध २ जुलैपासून रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला खेळवायचे की नाही, याचा निर्णय संघ व्यवस्थापन बुधवारी सकाळीच घेईल. स्वत: व्यवस्थापनातील सदस्यानेच याविषयी माहिती दिली आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यात एकूण पाच शतके झळकावूनही भारताच्या पदरी निराशा पडली. भारताने दिलेले ३७१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारतीय गोलंदाज दुसऱ्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरले, तर क्षेत्ररक्षणातही त्यांनी चुका केल्या. भारताने गेल्या ९ कसोटींपैकी सात कसोटींमध्ये पराभव पत्करला आहे.
आता त्यातच जसप्रीत बुमरा दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल असे समजते. पाठदुखीची भीती, स्नायूंची दुखापत व वर्कलोड मॅनेजमेंटच्या अंतर्गत (खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन) बुमराला विश्रांती देण्यात येणार आहे, असे समजते. अशा स्थितीत भारतीय संघापुढील समीकरण आणखी बिकट होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच बुमरा पाचपैकी तीनच सामने खेळणार, हे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र एजबॅस्टन येथील खेळपट्टी व भारतीय संघाची गरज पाहता बुमराला दुसरी कसोटीही खेळवली जाऊ शकते.
बुमराला पाठदुखीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीतील पाचव्या कसोटीत मध्यातूनच माघार घ्यावी लागली होती. तेव्हापासूनच त्याला पाठीच्या स्नायूंची काळजी घेण्याच्या हेतूने सामन्यांची योग्य निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळू शकला नाही. आयपीएलमध्ये ४ सामन्यांनंतर त्याने पुनरागमन केले. इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच बुमरा फक्त तीनच सामन्यांत खेळू शकेल, हे स्पष्ट झाले होते. पहिल्या कसोटीत बुमराने दोन्ही डावांत मिळून ४४ षटके गोलंदाजी केली.