नवी दिल्ली : भारतात २०२६ साली वनडे विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्याआधी पाकिस्तानात २०२५ साली चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानात येण्यास नकार दिल्यास, आम्ही २०२६ वर्ल्डकपवर बहिष्कार घालू, अशा इशारा पाकिस्तानने दिला आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने जाण्यास नकार दर्शवला आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रिड मॉडेलचा अवलंब करावा, अशी विनंती बीसीसीआयने आयसीसीला केली आहे. तसे झाल्यास, भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे आपले सामने पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशात खेळता येतील.
जिओ न्यूज उर्दूच्या मते, भारतीय संघ पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये न आल्यास, पाकिस्तानचा संघ २०२६ साली भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर बहिष्कार घालेल. विशेष म्हणजे, १९ ते २२ जुलैदरम्यान कोलंबो येथे होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी पाकिस्तानने हा इशारा दिला आहे. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रिड मॉडेलला विरोध करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा संपूर्णपणे पाकिस्तानात व्हावी, अन्य कोणत्याही देशात या स्पर्धेचे सामने खेळवले जाऊ नयेत, अशी पाकिस्तान बोर्डाची भूमिका आहे. भारतीय संघ याआधी आशिया चषक स्पर्धेसाठी २००८ मध्ये शेवटचा पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेल्यानंतर अन्य कोणत्याही स्पर्धांसाठी भारतीय संघ पाकिस्तानात गेलेला नाही.
हायब्रिड मॉडेल का अवलंबणार?
२०२३च्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान आयसीसीसमोर असाच पेचप्रसंग उभा राहिला होता. त्यावेळेलाही बीसीसीआयने पाकिस्तानात प्रवास करण्यास मनाई केली होती. त्यानंतर आयसीसीने हायब्रिड मॉडेलचा अवलंब केला होता. हे मॉडेल दोन्ही पक्षकारांनी मान्य केले होते. मात्र या मॉडेलमुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या आयोजनाला मुकावे लागले होते.