मुंबई : उत्तर प्रदेशने पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी घेतल्यानंतर ४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईनेही पाहुण्यांना चोख उत्तर दिले. शिवम दुबेच्या ११७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील साखळी गटातील सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईने ११७ धावांची आघाडी घेतली आहे.
मुंबईचे आघाडीचे पहिले पाच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मुंबईवर डावाने पराभवाची टांगती तलवार होती. मात्र शिवम दुबेने मुंबईचा डाव सावरला. त्याने शम्स मुलाणी याच्यासह सातव्या विकेटसाठी १७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुबेने चौफेर फटकेबाजी करताना १३० चेंडूंत ९ चौकार आणि ६ षटकारांसह ११७ धावा रचल्या. त्याला शम्स मुलाणीने चांगली साथ देताना ६३ धावांची खेळी केली. मात्र हे दोघेही माघारी परतल्यावर मोहित अवस्थीने १८ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराची आतषबाजी करत नाबाद ३४ धावा फटकावल्या. आता चौथ्या दिवशी अधिकाधिक धावांची भर घालून उत्तर प्रदेशचा डाव लवकर संपुष्टात आणण्यावर मुंबईचा भर असेल.