क्रीडा

विश्वचषकासाठी पाच शहरांचा विचार; भारतात रंगणारी स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत?

पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पाच शहरांची लवकरच निवड केली जाणार आहे. तसेच ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारतासह श्रीलंकेत संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पाच शहरांची लवकरच निवड केली जाणार आहे. तसेच ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारतासह श्रीलंकेत संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

भारतात यापूर्वी २०१६चा टी-२० विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर १० वर्षांनी भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. २०२४मध्ये अमेरिका व वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विजेतेपद मिळवले. आता पुढील वर्षी ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारतीय चाहत्यांना मायदेशात ही स्पर्धा पाहता येईल.

मात्र आयसीसीशी केलेल्या करारानुसार पाकिस्तान भारतात येणार नसल्याने त्यांचे सामने श्रीलंकेत होतील. तसेच पाकिस्तानचा संघ उपांत्य व अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास त्या लढतीदेखील श्रीलंकेतच होतील. भारतात सध्या मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद व मुल्लानपूर या पाच शहरांत टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येईल, असे समजते. त्यातही अंतिम फेरीसाठी मुंबईचा वानखेडे स्टेडियम व अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियम यांचा पर्याय राखीव ठेवण्यात आला आहे.

२०२३च्या विश्वचषकातील अंतिम फेरी अहमदाबादलाच झाली होती. तर यंदा महिलांचा एकदिवसीय विश्वचषक रंगणार असून त्याचा अंतिम सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे २०२६च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीच्या आयोजनाचा मान कुणाला मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल.

आक्रमकतेला पर्याय नाही : सूर्यकुमार

आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या लढतीबाबत भारताचा कर्णधार सूर्यकुमारने फारसे मत व्यक्त करणे टाळले. मात्र या लढतीत आमच्या देहबोलीत आक्रमकतेचा अभाव नसेल, असेही त्याने सांगितले. तसेच पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाने याविषयी भाष्य न करता आम्ही हा सामना अन्य सामन्याप्रमाणेच खेळू, असे सांगितले. रविवार, १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान आमनेसामने येतील.

रशिदची वेळापत्रकावर टीका

अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खानने आशिया चषकाच्या वेळापत्रकावर टीका केली आहे. संघ दुबईत स्थायिक असताना अफगाणिस्तानचे साखळी सामने अबुधाबीत होणार आहेत. त्यामुळे याचा नक्कीच खेळाडूंना शारीरिक फटका बसेल, असे रशिद म्हणाला. त्याशिवाय श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकानेसुद्धा या मताला दुजोरा देत दोन सामन्यांमध्ये विश्रांतीसाठी किमान २-३ दिवस असावेत, असे म्हटले.

KDMC रुग्णालयात शिवसेना नगरसेवकाची महिला डॉक्टरला मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

Mumbai : रिव्हर्स घेताना बेस्ट बसची पादचाऱ्याला धडक; नियंत्रण सुटल्याने पार्क केलेल्या ३ वाहनांचे नुकसान, Video

भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग १० टक्के वेगाने वाढणार; देशांतर्गत मागणी, वाढत्या निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात क्षेत्र वाढण्याची उद्योगाला अपेक्षा

Mumbai-Pune Railway : अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा; मुंबई-पुणे मार्गावर काही रेल्वेगाड्या पुन्हा धावल्या

५०० रुपयांऐवजी घेतले ५० युरो! आग्र्यात फ्रेंच पर्यटकांची टॅक्सीचालकाकडून फसवणूक, पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले, Video