क्रीडा

विश्वचषकासाठी पाच शहरांचा विचार; भारतात रंगणारी स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत?

पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पाच शहरांची लवकरच निवड केली जाणार आहे. तसेच ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारतासह श्रीलंकेत संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पाच शहरांची लवकरच निवड केली जाणार आहे. तसेच ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारतासह श्रीलंकेत संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

भारतात यापूर्वी २०१६चा टी-२० विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर १० वर्षांनी भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. २०२४मध्ये अमेरिका व वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विजेतेपद मिळवले. आता पुढील वर्षी ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारतीय चाहत्यांना मायदेशात ही स्पर्धा पाहता येईल.

मात्र आयसीसीशी केलेल्या करारानुसार पाकिस्तान भारतात येणार नसल्याने त्यांचे सामने श्रीलंकेत होतील. तसेच पाकिस्तानचा संघ उपांत्य व अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास त्या लढतीदेखील श्रीलंकेतच होतील. भारतात सध्या मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद व मुल्लानपूर या पाच शहरांत टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येईल, असे समजते. त्यातही अंतिम फेरीसाठी मुंबईचा वानखेडे स्टेडियम व अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियम यांचा पर्याय राखीव ठेवण्यात आला आहे.

२०२३च्या विश्वचषकातील अंतिम फेरी अहमदाबादलाच झाली होती. तर यंदा महिलांचा एकदिवसीय विश्वचषक रंगणार असून त्याचा अंतिम सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे २०२६च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीच्या आयोजनाचा मान कुणाला मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल.

आक्रमकतेला पर्याय नाही : सूर्यकुमार

आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या लढतीबाबत भारताचा कर्णधार सूर्यकुमारने फारसे मत व्यक्त करणे टाळले. मात्र या लढतीत आमच्या देहबोलीत आक्रमकतेचा अभाव नसेल, असेही त्याने सांगितले. तसेच पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाने याविषयी भाष्य न करता आम्ही हा सामना अन्य सामन्याप्रमाणेच खेळू, असे सांगितले. रविवार, १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान आमनेसामने येतील.

रशिदची वेळापत्रकावर टीका

अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खानने आशिया चषकाच्या वेळापत्रकावर टीका केली आहे. संघ दुबईत स्थायिक असताना अफगाणिस्तानचे साखळी सामने अबुधाबीत होणार आहेत. त्यामुळे याचा नक्कीच खेळाडूंना शारीरिक फटका बसेल, असे रशिद म्हणाला. त्याशिवाय श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकानेसुद्धा या मताला दुजोरा देत दोन सामन्यांमध्ये विश्रांतीसाठी किमान २-३ दिवस असावेत, असे म्हटले.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके