ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा मार्ग स्वीकारलेल्या उमेदवारांना ठाणेकर मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात महायुती झाल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या १९ आजी-माजी नगरसेवक व इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, यापैकी १८ बंडखोरांना पराभवाचा सामना करावा लागला, तर प्रमिला मुकुंद केणी या एकमेव बंडखोर उमेदवाराने विजयश्री खेचून आणली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना होती. मात्र, ऐनवेळी वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतल्याने अनेक इच्छुकांची उमेदवारी कापली गेली. यामुळे नाराजीचा सूर उमटत शिवसेना (शिंदे गट) मधील ११ आणि भाजपमधील ७ इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, मतदारांनी पक्षशिस्त मोडणाऱ्या या उमेदवारांना स्पष्ट नकार दिला.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २३ मधून शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी नाकारल्यानंतर प्रमिला मुकुंद केणी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत बंडखोरांमध्ये एकमेव यशस्वी उमेदवार ठरण्याचा मान मिळवला. त्यांच्या विजयातून स्थानिक पातळीवरील वैयक्तिक संपर्क, जनाधार आणि मतदारांचा विश्वास निर्णायक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या निकालाने ठाण्यातील राजकारणात एक संदेश दिला असून, बंडखोरीपेक्षा पक्षीय निर्णय आणि संघटनात्मक ताकदीलाच मतदारांनी अधिक महत्त्व दिले असल्याचे दिसून आले आहे.