ठाणे : मुंब्र्यातील फेरीवाल्याला मराठीत बोला, असे सांगणाऱ्या तरुणाला जाहीर माफी मागायला लावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता याविरोधात मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी हा सर्व प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. याविरोधात मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली असून कल्याण, ठाणे, विरार, मुंबईत घडणाऱ्या घटना पाहिल्या, तर सत्तापरिवर्तन झाल्यानंतर यांच्यातली हिंमत मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचे दिसत आहे.
गुरुवारी मुंब्र्यातील कौसा भागात २१ वर्षीय तरुण एका फळ विक्रेत्याकडे फळे खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा फळ विक्रेत्याने हिंदीत संवाद सुरू केल्यावर सदर तरुणाने त्याला ‘मराठीत बोला’ असे सांगितले. त्यावरून फळविक्रेता व तरुणामध्ये वाद झाला. यानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही बोलावले. आसपास गर्दी जमा झाली. या सगळ्यांनी मिळून सदर तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडले. यावेळी जमलेल्या व्यक्तींनी सदर तरुणाने शिवीगाळ केल्याचाही दावा केला.
कल्याण, ठाणे, विरार, मुंबईत घडणाऱ्या घटना पाहिल्या, तर सत्तापरिवर्तन झाल्यानंतर यांच्यातली हिंमत मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचे दिसत आहे. मुंब्र्यातल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेले. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुले जमली आणि तिथे घोषणाबाजी केली. हे करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय यावरून तुम्ही पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करणार?”, असेही अविनाश जाधव म्हणाले.
मला भीती वाटतेय
त्यांनी मला शिवीगाळ केली. मी म्हटले शिव्या देऊ नका, तर त्यानंतर मला म्हणाले माफी माग. मी माफीही मागितली. पण मला नंतर पोलीस स्टेशनमध्ये चार तास बसवून ठेवले. माझ्या आईलाही स्टेशनबाहेर बसवून ठेवले असल्याची माहिती या तरुणाने दिली आहे.
एवढी हिंमत कशी होते?
या सर्व प्रकारानंतर या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी देखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंब्र्यातली ही घटना दुर्दैवी आहे. मराठी भाषेवरून वाद झाल्यानंतर तिथे काही मुसलमान मुले जमली. त्यांनी व्हिडीओही रेकॉर्ड केला. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही असे म्हणतात आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात? यांची एवढी हिंमत कशी होते?” असा सवाल जाधव यांनी केला आहे.