भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील अनेक छोट्या-मोठ्या हातगाड्या, हॉटेल्स आणि चायनीज सेंटर्सच्या दुकानांबाहेर बसविण्यात आलेल्या एक्झॉस्ट फॅनमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या घटनाही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा एक्झॉस्ट फॅनवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यालगत असलेल्या चायनीज सेंटर, हॉटेल चालक आणि हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनेक दुकानदारांनी रस्त्याच्या दिशेने एक्झॉस्ट फॅन बसवले आहेत. या फॅनमधून निघणारा तिखट, आंबट, धूरकट आणि डोळ्यांना जळजळ करणारा वायू थेट रस्त्यावर फेकला जात असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या धुरामुळे वाहनचालकांच्या डोळ्यांत जळजळ, चुरचुर आणि पाणी येऊन काही क्षणांसाठी दृष्टी मंदावते. परिणामी रस्त्यावरील दृश्यता कमी होऊन यापूर्वी अनेक अपघात घडल्याची नोंद आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत महानगरपालिकेने खाद्यपदार्थ संबंधित विक्रेत्यांना दुकानाबाहेरच्या दिशेने बसवलेले एक्झॉस्ट फॅन तत्काळ हटवून त्या ठिकाणी चिमणी बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, चायनीज सेंटर, हॉटेलचालक आणि हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, धोका निर्माण असा इशाराही महानगरपालिकेने दिला आहे.