भिवंडी : भिवंडी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नारपोली भंडारी चौक परिसरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. या घटनेत लाठ्याकाठ्या, प्लास्टिक खुर्चा आणि दगडांचा मारा झाल्याने दोन्ही बाजूंचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक २० मधील भाजप उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांची प्रचार कार्यालये समोरासमोर असल्याने परिसर आधीपासूनच संवेदनशील आहे. सायंकाळी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या भागातून जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केल्याने दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हीच वादावादी पुढे जाऊन हाणामारीत रूपांतरित झाली.
या गोंधळात दोन्ही बाजूकडून लाठ्याकाठ्या आणि दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने पोलीस व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी, "पोलिसांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यालयावर दगडफेक केली," असा आरोप केला आहे. तर काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांच्या कन्या हर्षाली म्हात्रे यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केल्याचा प्रत्यारोप केला आहे.
घटनेनंतर नारपोली आणि भोईवाडा पोलीस ठाण्यांतील मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.