सुमित घरत/भिवंडी
सदैव त्रिशंकू अवस्थेत राहणाऱ्या भिवंडी महापालिकेच्या राजकारणात २०१७ मध्ये काँग्रेसला ४७ जागांवर विजय मिळाला होता; परंतु त्यावेळी कोणार्क विकास आघाडीने सत्ता काबीज केली होती. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीय बहुमत कोणालाही मिळालेले नसल्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे सत्ता स्थापन करतील? की पुन्हा कोणार्क विकास आघाडी फॉर्म्युला लागू करावा, लागणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. या सगळ्यात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकून बहुमताचा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले, तर भाजपाला २२, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १२ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ३० पैकी केवळ ६ जागा भिवंडी पश्चिम, उर्वरित २४ जागा भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात आहेत.
निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात झालेल्या वादामुळे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी व भिवंडी पूर्व आमदार रईस शेख यांच्यात तणाव निर्माण झाला होता. तथापि, रईस शेख यांनी स्थानिक नेतृत्वांना बाजूला सारत वरिष्ठांशी हातमिळवणी करून काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांना छुप्या प्रचारातून पाठिंबा दिला. त्यामुळे भिवंडी पूर्वेत जिंकलेल्या काँग्रेस २४ व राष्ट्रवादी १२ नगरसेवक हे रईस शेख समर्थक आहेत.
परंतु बहुमत मिळवण्यासाठी त्यांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रईस शेख यांना यश मिळेल की पुन्हा कोणार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील यांचे करिष्मा पाहायला मिळेल, हे आता ठरणार आहे.
भाजपचे अंबरनाथ पॅटर्न?
भाजप राज्यात सत्ता स्थापनेसाठी कधी काँग्रेस, तर कधी एमआयएमसोबत युती करण्यास धजावत आहे. अंबरनाथमध्ये त्यांनी सर्व काँग्रेस सदस्यांना सामील करून सर्वांना चकित केले होते. भिवंडीमध्येही भाजपच्या २२ सदस्यांद्वारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला गळ्याला लावून सत्ता स्थापनेसाठी धोरण आखू शकते. यासाठी भाजप शिंदे गटाची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालासोबत घेऊ शकतो. मात्र मागील वेळी बंडखोरी करणाऱ्यांना अपात्र ठरवल्यामुळे या वेळी बंडखोरी करण्याची शक्यता कमी असून, भाजपाचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.