ठाणे : दिवा शहरात लोकसंख्या वाढत असताना आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून दिव्यातील पाच लाख लोकसंख्या आरोग्य सेवेपासून वंचित आहे.
दिवा शहरातील आपला दवाखाना हा ठाणे मनपामार्फत चालविण्यात येणारा महत्त्वाचा आरोग्य सेवा उपक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला असून या निर्णयामुळे दिव्यातील पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य हक्कावर गदा आली आहे. याआधीच फिरता दवाखाना बंद करून नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित करण्यात आले होते आणि आता आपला दवाखाना ही बंद करून महानगरपालिकेने स्वत: दिलेल्या लिखित आश्वासनाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे दिव्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात या मागणीसाठी सोमवारी दिव्यातील उद्धव सेनेच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देत जाब विचारला.
दिव्यातील नागरिकांकडून नियमित मालमत्ता कर व स्थानिक कर आकारले जात असूनसुद्धा आरोग्य सेवा न पुरविणे हे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग व नागरिकांच्या हक्कांचा भंग आहे. या निष्काळजी व बेकायदेशीर कृतीमुळे भारतीय दंड संहिता कलम १६६, २६९, ३३६ आणि ३०४ अ अंतर्गत जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दिव्यात स्थायी दवाखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत आपला दवाखाना अखंडित सुरू ठेवणे आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपत्कालीन सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी आहे. अन्यथा दिव्यातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला राहील, असा इशारा उद्धव सेनेचे कल्याण कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.
यावेळी निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख सचिन पाटील महिला शहर संघटिका ज्योती पाटील, आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या काळात दिव्यात दोन रुग्णालये सुरू होणार आहेत. सध्या याठिकाणी २ आरोग्य केंद्र सुरू असून दोन आयुष्मान आरोग्य मंदिर देखील सुरू आहेत. तसेच येत्या काळात आणखी दोन आरोग्य मंदिर सुरू केले जाणार आहेत. तसेच येत्या काळात या भागासाठी रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.डॉ. प्रसाद पाटील - वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा
...अन्यथा न्यायालयात जाणार!
दिव्यात स्थायी दवाखाना व २४x७ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत ‘आपला दवाखाना’ अखंडित सुरू ठेवणे आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपत्कालीन सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी आहे. अन्यथा दिव्यातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला राहील, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कल्याण - कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.