ठाणे : मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेलेले डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजीत पवार हे अवघ्या ४८ तासातच स्वगृही परतले. "तडीपार करू, मकोका लावू, दोन वर्षे जेलमध्ये डांबून ठेऊ, ईडीची कारवाई करू अशा धमक्या नजीब मुल्ला यांनी दिल्याने आपण घाबरलो होतो. घरातही अस्वस्थता निर्माण झाली होती. माझ्या तसेच माझ्या सहकाऱ्यांच्या घरी पोलीस पाठवले जात होते. त्यामुळे मी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो. त्यातूनच मला जबरदस्तीने नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांच्यासमोर उभे केले आणि माझा पक्ष प्रवेश करून घेतला, असा खळबळजनक आरोप अभिजत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, परमार या बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास भाग पडणारा आणि जमील शेख याची हत्या करणाऱ्याला आणखी किती बळी हवे आहेत ? अभिजीत पवार याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा हा प्रकार झाला आहे. अजित पवार यांना माझी विनंती आहे की हे सर्व थांबवा; तुमचा माणूस ठाण्यात काय करतोय, हे बघा, असे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मंगळवारी अभिजीत पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. गुरुवारी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडली. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
अभिजीत पवार म्हणाले की, ठाणे शहरात राजकीय ब्लॅकमेलिंग सुरू आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड हे माझे नेते आहेत, मी त्यांची साथ मरेपर्यंत सोडणार नाही. निवडणुकीच्या वेळी माझ्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी मी शांतपणे कार्यालयातून निघून गेलो. तरीही माझ्यावरच ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मला सुमारे ५० दिवस बाहेर रहावे लागले होते. त्यानंतर नजीब मुल्ला हे फोन करून माझ्यावर दबाव टाकत होते. तडीपारी, मकोका याची धमकी देऊन डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात होता. माझ्या सहकाऱ्यानाही दमबाजी केली जात होती. ज्यांच्यावर एकही गुन्हा नाही, अशा माझ्या मित्रांना नजीब मुल्ला यांच्या दबावामुळे पोलिसही दमबाजी करीत होते. त्या दबावातूनच मी फसलो गेलो. मी आत्महत्या करणार होतो. मात्र, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला आणि मी आज सर्वांच्या समोर आलो. अजित दादांना आपण विनंती करतो की ब्लॅक मेलिंग करून आमचे आयुष्य बिघडविन्याचा प्रयत्न करणाऱ्याला आवरा, असे पवार यांनी सांगितले.
दुसरा परमार घडवायचा आहे का? - आव्हाड
हे ब्लॅकमेलिंग जो करीत आहे. त्याने प्र्माचा जीव घेतला आहे. जमील शेखला गोळ्या घातल्या आहेत. आणखी एक आत्महत्या त्याला घडवायची आहे का ? आमच्या पक्षाचा कळवा- मुंब्रा भागाचे अध्यक्ष शमीम खान यांना दुबईहून धमक्याचे फोन आले होते. आणखी किती घरे बरबाद केली जाणार आहेत. अभिजीत घाबरला म्हणून तिकडे गेला होता. माझ्या संपत्तीची चौकशी करायला लावणार होते. आपले आव्हान आहे की त्यांनी बिनधास्त करावी. पण, त्याचवेळी जमील शेख खून प्रकरणाचा तपास नितीन ठाकरे या अधिकाऱ्याकडे द्या. फडणवीस हे असले प्रकार करीत नाहीत. पण, अजितदादांच्या हाताखालचे माणसे काय करतात, हे या माध्यमातून राज्याला सांगत आहे. याबाबत आपण फडणवीस यांची भेट घेणार आहोत.
जेलमध्ये जेवण आणि फोन
जमील शेखच्या खूनप्रकारणातील आरोपी एकाच ठिकाणी आहेत. ठाणे जेलमधील कॅन्टीन राबोडीतील एक माणूस चालवीत आहे. तो माणूस जमील हत्याकांडातील आरोपीना मोबाईल फोन पुरवीत आहे. या हत्याकांडातील एका आरोपीने सुपारी घेणाऱ्या गुंडाला जेलमध्येच मारहाण केली आहे. राबोडीतून सोने- हिरे यांची तस्करी होत आहे. एकूणच ठाण्यात भस्मासुर जन्माला घातला जात आहे, याकडे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनीही लक्ष द्यावे, असे आवाहनही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.