भिवंडी : शहरात रविवारी रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोमवारी सकाळी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे शहराच्या लगत असलेल्या कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या नदी नाका, ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी इत्यादी भागात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.
शहरातील भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी देखील नागरिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
ईदगाह परिसरात कंबरभर पाणी साचल्याने महिलांसह नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली होती तर भाजी मार्केटमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भाजी विक्रेत्यांसह भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.