सोनार गल्ली 
ठाणे

सोने वितळविण्याचा अवैध व्यवसाय; उल्हासनगरातील सोनार गल्लीतील प्रकार, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ मध्ये असलेल्या सोनार गल्लीने आजपर्यंत सोनारांच्या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र...

नवनीत बऱ्हाटे

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ मध्ये असलेल्या सोनार गल्लीने आजपर्यंत सोनारांच्या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या गल्लीत नियमबाह्य पद्धतीने सोने वितळविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर आणि सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. या अवैध व्यवसायामुळे परिसरातील वातावरणात विषारी धुराचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अनेकांना श्वसनाचे विकार, अस्थमा, डोळ्यांमध्ये जळजळ यांसारख्या आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.

उल्हासनगर शहराच्या सोनार गल्लीत सध्या सुमारे १०० हून अधिक दुकानदार अवैधरीत्या सोने वितळविण्याचा व्यवसाय करत आहेत. ही प्रक्रिया सोने चोरण्याच्या प्रकारातील असल्याचे बोलले जाते आणि या प्रक्रियेसाठी अत्यंत घातक रसायनांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे परिसरात सतत विषारी धूर पसरतो, जो नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हे रासायनिक वायू श्वसनाच्या समस्या वाढवतात आणि दीर्घकालीन आजारांना निमंत्रण देतात. यामुळे गल्लीत राहणाऱ्या नागरिकांना, विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांना, या विषारी धुराचा अधिक त्रास होत आहे.

अवैध सोने वितळविण्यासाठी दुकानदार मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर वापरतात, जो नियमांच्या विरोधात आहे. हे सिलिंडर अत्यंत असुरक्षित पद्धतीने वापरले जात असल्याने मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच या गल्लीत सिलिंडरचा स्फोट होऊन अनेक घरांचे नुकसान झाले होते, सुदैवाने जीवितहानी टळली होती. मात्र, या घटनेनंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. दुकानदार अजूनही याच धोकादायक पद्धतीने व्यवसाय करीत आहेत. सिलिंडरचा वापर केवळ अवैधच नाही, तर अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक देखील आहे.

सामूहिक हस्ताक्षर मोहीम

या अवैध धंद्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १०० रहिवाशांनी एकत्र येऊन सामूहिक हस्ताक्षर मोहीम चालवली आहे आणि स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. या निवेदनात नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, प्रशासनाने जर तातडीने कारवाई केली नाही, तर ते न्यायालयीन मार्गाने न्याय मिळवण्यासाठी पुढे जाणार आहेत. नागरिकांची मुख्य मागणी म्हणजे या अवैध सोने वितळविण्याच्या व्यवसायाला त्वरित थांबवावे आणि त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावे.

तक्रारी करूनही ठोस कारवाई नाही !

सोनार गल्लीतील नागरिकांनी या समस्येबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. अग्निशमन विभाग आणि महापालिकेला देखील सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांच्या मते, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री कारवाई केली जात आहे, ज्याचा प्रत्यक्षात कोणताही परिणाम दिसून येत नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे की, दुकानदारांनी आपल्या दुकानांना इतके पुढे वाढवले आहे की, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या गाड्यांना या गल्लीत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका आहे.

एल निनो, युद्धामुळे महागाई वाढणार; बँक ऑफ बडोदा, प्रभुदास लीलाधरचा महागाई वाढण्याबाबत धोक्याचा इशारा

१०० टक्के इथेनॉलला मंजुरी - नितीन गडकरी

पुण्यात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन;२८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान आयोजन

वाशिम : पत्नीसह दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून घेतला गळफास

उन्हाळी सुट्टी संपली; आजपासून शाळांची घंटा वाजणार!