बदलापूर : बदलापूरजवळील कासगाव ग्रामपंचायत हद्दीत श्वानांच्या हल्ल्यात चिमुकली मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वीही तीन ते चार वेळा गावात भटक्या श्वानांकडून ग्रामस्थांवर हल्ल्याचे प्रयत्न झाले होते. मात्र इतर ग्रामस्थ मदतीला धावल्याने पुढील प्रसंग टळल्याचे ग्रामस्थानी सांगितले.
अंबरनाथ तालुक्यातील कासगाव येथे राहणाऱ्या ओवी नरेश राणे या पाच वर्षीय चिमुकलीवर दोन दिवसांपूर्वी भटक्या श्वानांनी हल्ला केला. ओवी घराबाहेर खेळत असताना चार ते पाच भटक्या श्वानांनवी तिच्यावर हल्ला चढवला.
मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि श्वानांना हुसकावून लावले. त्यानंतर ओवीला तातडीने बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारानंतर ओवीची प्रकृती स्थिर झाली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ती घरी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहे.या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. कासगाव परिसरात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे.याबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप ग्रामस्थ असून श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी ग्रामसेवक हर्षल गगेयांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.