भिवंडी मेट्रो जानेवारी २०२७ मध्ये सुरू होणार; पालिका-MMRDA अधिकारी यांचा एकत्रित पाहणी दौरा 
ठाणे

भिवंडी मेट्रो जानेवारी २०२७ मध्ये सुरू होणार; पालिका-MMRDA अधिकारी यांचा एकत्रित पाहणी दौरा

ठाणे-भिवंडी दरम्यानचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होऊन, मेट्रो जानेवारी २०२७ पर्यंत सुरू होऊ शकते, अशी प्रतिक्रिया आमदार महेश चौघुले यांनी दिली आहे.

Swapnil S

भिवंडी : ठाणे ते भिवंडी दरम्यान सुरू असलेले मेट्रो काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असून, भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो भुयारी मार्गाने जाईल की वरून याची स्पष्टता नसल्याने, ठाणे-भिवंडी दरम्यानचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होऊन, मेट्रो जानेवारी २०२७ पर्यंत सुरू होऊ शकते, अशी प्रतिक्रिया आमदार महेश चौघुले यांनी दिली आहे. ते मेट्रो कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

शहरात मेट्रो प्रकल्पासह एमएमआरडीए माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसह शहरातील वाहतूक नियोजनावर चर्चा करण्यासाठी महापालिका मुख्यालयात महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका, एमएमआरडीए आणि मेट्रो अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीस आमदार महेश चौघुले, आयुक्त अनमोल सागर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर सर्वांनी अंजुरफाटा ते धामणकर नाका दरम्यान सुरू असलेली मेट्रो कामाची पाहणी केली. मेट्रोचे काम प्रगतिपथावर असून, परिसरातील स्वच्छता, रस्त्यांचे रुंदीकरण यासह शहरात सुरू असलेल्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. यामुळे मेट्रो दरम्यानच्या रस्ते रुंदीकरणासह पुढील टप्प्यातील कल्याण रोड परिसरातील कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

महापौर नारायण चौधरी आणि आयुक्त अनमोल सागर हे शहर विकासासाठी आग्रही असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास आमदार महेश चौघुले यांनी व्यक्त केला. तसेच मनपा मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडून विविध टप्प्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी ३७७१ कोटी रुपये निधी लागणार असून, हे काम तीन टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

महापौर नारायण चौधरी यांनी शहरात मेट्रो सुरू होणार असल्याचे सांगितले, परंतु परिसराची स्वच्छता मेट्रो प्रशासनाने सांभाळावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय मेट्रो परिसरात जाहिरात फलकांच्या माध्यमातून पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळवता येईल का यावर आयुक्त अनमोल सागर यांनी चर्चा केली.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली