ठाणे : शहरातील शाळांच्या परिसरात वाढलेल्या पानटपऱ्या, अनधिकृत स्टॉल, चिकन शॉप आणि काही ठिकाणी अमली पदार्थांच्या विक्रीच्या तक्रारींवरून ठाणे महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भवितव्याशी खेळ सुरू असताना महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर शाळा, मंदिरे आणि इतर धर्मस्थळांच्या परिसरातील अतिक्रमणांवर पोलिसांच्या समन्वयाने विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त सौरभ राव यांनी सभागृहात दिली.
शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील अनेक शाळांसमोर पानटपऱ्या आणि विविध अनधिकृत स्टॉल सुरू असल्याचे सांगत त्यांनी, 'महापालिकेच्या स्वतःच्या जागाच सुरक्षित राहिलेल्या नाहीत. जवळपास प्रत्येक शाळेसमोर पानटपऱ्या उभ्या आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या भवितव्यावर होत आहे,' असा गंभीर आरोप केला.
सरनाईक यांनी पुढे सांगितले की, शाळांसमोर पानमसाला, तंबाखू आणि सिगारेटची सहज उपलब्धता ही चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चिकन शॉप आणि इतर स्टॉलमुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे. ‘शाळांसमोर पानटपऱ्यांनाच परवानगी मिळते का? इतर व्यवसायांना जागा मिळत नाही का?’ असा सवाल त्यांनी केला. त्यांनी आंबेडकर भवन परिसरातील अतिक्रमणाचाही मुद्दा उपस्थित करत काही कॉल सेंटरमधील कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून त्यावर अंकुश आणण्याची मागणी केली.
पालिका विशेष मोहीम हाती घेणार
नगरसेवक पवन कदम यांनीही या मुद्द्याला दुजोरा देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. शाळांच्या परिसरातील सर्व अनधिकृत पानटपऱ्या, स्टॉल आणि संशयास्पद व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. शाळा, मंदिरे, धर्मस्थळे आणि अन्य संवेदनशील ठिकाणांच्या परिसरातील अतिक्रमणांवर उद्यापासून विशेष मोहीम हाती घेतली जाईल. यासाठी महापालिका आणि पोलिसांचा संयुक्त समन्वय राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पानटपऱ्या, स्टॉल आणि अन्य अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.