राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे कळवा पुलाच्या उद्गघाटन कार्यक्रम संपल्यानंतर गर्दीतून वाट काढत पुढे जात असताना एका महिलाला बाजूला केले. यानंतर त्या महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये हल्लकल्लोळ माजला. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी अटक टाळण्यासाठी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावर झालेल्या सुनावणीनुसार कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, जामीन मिळाला असला तरी या आरोपांमुळे आपण खुश नसल्याची भावना व्यक्त केली. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले की, "एका बाईला पुढे करुन महाभारतासारखं राजकारण केले. मला अडकविण्यासाठी हे षडयंत्र होते. पोलिसांवरील दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण मला असे वाटते की, गुन्हा नोंदविण्यापूर्वी व्हिडिओ पहायला हवा होता. अटकपूर्व जामीन मिळाला असला तरीही माझी अस्वस्थता अजूनही शांत झालेला नाही." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंब्रा येथील कळवा, ठाणे शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.