ठाणे : सध्या ठाण्यातील काही भागांना पाणी कपातीच्या संकटांना सामोरे जावे लागत असले तरीदेखील उन्हाळ्यात पाण्याचे चटके सहन करण्याची वेळ ठाणेकरांवर येणार नसल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. धरणात पुरेसा साठा असल्याने पावसाळ्यापर्यंत तो ठाण्याला पुरेल एवढा असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु तो पर्यंत १५ दिवसांनी घेतले जाणारे शटडाऊन कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. शहरासाठी दररोज ६१६ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात शहराला सुमारे ५८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत होता. अलीकडे त्यात ५ दशलक्ष लिटरची वाढ होऊन सध्या सुमारे ५९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. या पाणीपुरवठ्यात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ९० दशलक्ष लिटर पाणी मिळते.
असे असेल तरी देखील घोडबंदरला उन्हाळा सुरू होत असतानाच पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
दुसरीकडे महापालिका मुख्यालयाच्या समोरील म्हणजेच पाचपाखाडी भागातही पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्याचे चित्र मागील आठवड्यात दिसून आले आहे. शिवाय कळवा, मुंब्रा आणि दिव्यासारख्या भागांनादेखील पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
दोन टप्प्यात पाण्यासाठी शटडाऊन
उन्हाळ्यात ठाणेकरांना पाणी टंचाईचे चटके तीव्र स्वरूपात भासू नयेत यासाठी पावसाळा संपल्यानंतर महापालिकेकडून दर १५ दिवसांतून एकदा दोन टप्प्यात शटडाऊन घेतले जात आहे. त्यामुळे ठाणेकरांना उन्हाळा संपल्यानतंरही पाणी टंचाईचे चटके तेवढ्या प्रमाणात जाणवत नसल्याचे चित्र आहे. हे शटडाऊन या पुढेही सुरूच राहणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही दिवस पाऊस लांबला तरीदेखील त्याचा फारसा परिणाम पाणीपुरवठ्याच्या वितरणावर होणार नसल्याचेही सांगितले जात आहे.
वाढीव पाण्यावर ठोस निर्णय नाही
मात्र शहरातील वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात उभारल्या जाणाऱ्या नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडू लागल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे महापालिकेने पुढील ३० वर्षांसाठी पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार भविष्यात शहराला दररोज सुमारे १११६ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्याच्या मंजूर कोट्याव्यतिरिक्त सुमारे ४०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने सूर्या आणि भातसा धरणांसह स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरू केला आहे तसेच एमएमआरडीएच्या प्रस्तावित काळू धरणातून ४०० दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मिळावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.