ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतील जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी रात्री पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून शहरात पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. गेले १५ दिवस लागू असलेल्या पाणी कपातीमुळे पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून ते पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कल्याण फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीच्या कामादरम्यान महापालिकेची जुनी प्री-स्ट्रेस काँक्रीट जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनी जुनी असल्याने दुरुस्तीसाठी पाच दिवस लागले. मात्र दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करताच जलवाहिनी आणखी तीन ठिकाणी फुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेने १९ डिसेंबरपर्यंत ५० टक्के पाणी कपात लागू करत पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेतले.
या कालावधीत शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. अनेक गृहसंकुलांच्या टाक्या रिकाम्या झाल्या, तर महापालिकेच्या साठवण टाक्यांमधील पाणीसाठाही कमी झाला. ठाणे शहर आणि घोडबंदर परिसरात टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली. काही ठिकाणी पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी मागणीच्या तुलनेत टँकर अपुरे पडले. खासगी टँकरचालकांकडून १० हजार लिटर पाण्यासाठी तीन हजार रुपयांपेक्षा अधिक, तर काही ठिकाणी आठ ते नऊ हजार रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. दरम्यान, जलवाहिनीची दुरुस्ती दिवसरात्र पालिकेच्या पथकांकडून सुरू होती. अखेर काम पूर्ण झाल्यानंतर शहरात पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अनेक संकुलांच्या तसेच महापालिकेच्या साठवण टाक्या रिकाम्या असल्याने त्या भरून पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील.