विजय पंचमुख / बदलापूर
उल्हास नदीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर निर्माल्य टाकले जात असतानाच काही वाहनचालकांकडून थेट नदीपात्रातील पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नदीतील जलप्रदूषणात मोठी भर पडत असून प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी पर्यावरणप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणारी उल्हास नदी अनेक अर्थांनी जीवनवाहिनी मानली जाते. या नदीच्या पाण्यावर अनेक शहरे आणि ग्रामपंचायती अवलंबून आहेत. बारवी धरणातून सोडलेले पाणी बारवीच्या प्रवाहातून उल्हास नदीत येऊन मिळते. नदीवरील बंधाऱ्यांमधून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते आणि तेच पाणी शहरांना तसेच उद्योगांना वापरासाठी पुरवले जाते.
मात्र, दिवसेंदिवस या नदीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात बॅरेज बंधाऱ्याजवळ औद्योगिक सांडपाणी मिसळले जात असल्याचे समोर आले होते. त्यात आता शहरातील सांडपाण्याचीही भर पडत आहे.
दरम्यान, बदलापूरमधील चौपाटी परिसरात सायंकाळच्या वेळी तसेच शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. याच ठिकाणी काही नागरिक आपली दुचाकी थेट नदीपात्रात उतरवून वाहनांची धुलाई करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नदीत निर्माल्य टाकणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. निर्माल्यासोबत देवांच्या जुन्या प्रतिमा आणि मूर्तींचे विसर्जनही येथेच केले जात असल्याने फेरफटका मारणाऱ्या नागरिकांच्या पायाखाली या मूर्ती आणि प्रतिमा येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.