

रंगांच्या उत्सवात भांग पिण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. होळीच्या जल्लोषात अनेकजण थंडाई किंवा भांगचे पेय घेतात. मात्र भांग पिण्याचे प्रमाण ओलांडले तर आनंदाऐवजी त्रासाला सामोरे जावे लागू शकते. होळीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञ काळजी घेण्याचा सल्ला देतात.
भांगमध्ये आढळणारे कॅनॅबिनॉइड घटक मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात. भांगचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, चक्कर, घाबरल्यासारखे वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा रक्तदाबात चढ-उतार होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
काही वेळा व्यक्ती गोंधळलेली वाटते, जास्त झोप येते किंवा बेचैनी वाढते. रिकाम्या पोटी भांग घेणे, दारूसोबत सेवन करणे किंवा आधीपासून औषधे सुरू असणे यामुळे याचे दुष्परिणाम अधिक तीव्र होऊ शकतात. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकार किंवा मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, सर्वप्रथम भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी वाढते. लिंबूपाणी, नारळपाणी किंवा साधे कोमट पाणी घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच हलका, पचायला सोपा आहार घ्यावा. दही-भात, खिचडी किंवा फळे यांचा समावेश केल्यास पोट शांत राहते.
भांग जास्त झाली असे वाटल्यास घाबरून न जाता शांत ठिकाणी बसून विश्रांती घ्यावी. गोड पदार्थ, जसे साखर, चॉकलेट किंवा गूळ हे थोड्या प्रमाणात घेतले तर ऊर्जा मिळण्यास मदत होते.
मोठा श्वास घेणे, थंड पाण्याने चेहरा धुणे आणि डोळे मिटून आराम करणे या गोष्टींमुळे अस्वस्थता कमी होते. लक्षणे कमी न झाली नाही किंवा छातीत दुखायला लागलं, श्वास घ्यायला त्रास झाला किंवा सतत उलट्या झाल्या तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रंगांच्या आनंदात आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे 'संयमाने साजरी केलेली होळीच खरी रंगतदार' हे लक्षात ठेवूनच सणाचा आनंद घ्यावा.