होळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा सण. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करून नकारात्मकतेचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा होळीचा सण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय गणितांमुळे विशेष चर्चेत आला आहे.
यंदाची होळी साधी-सोपी नाही. फाल्गुन पौर्णिमेला भद्रा काळाचे सावट आणि त्यानंतर वर्षातील पहिले चंद्रग्रहण या दुर्मिळ योगामुळे होलिका दहनाचा मुहूर्त, तारीख आणि विधी याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नेमका दिवस कोणता? होळी पेटवायची किती वाजता? आणि कोणती काळजी घ्यावी? पाहूया सविस्तर माहिती.
नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त
२ मार्च २०२६ (फाल्गुन पौर्णिमा)
दिवसभर भद्रा असल्यामुळे संध्याकाळी होळी पेटवत नाहीत. भद्रा रात्री ११ वाजून १० मिनिटांनी समाप्त होईल. त्यानंतर रात्री ११ वाजून १४ मिनिटे ते ११ वाजून २६ मिनिटे हा केवळ १२ मिनिटांचा ‘अति शुभ’ मुहूर्त मानला जात आहे. या वेळेत भद्रा संपलेली असेल आणि चंद्रग्रहणाचे वेध सुरू झालेले नसतील.
३ मार्च २०२६ (पर्यायी दिवस)
या दिवशी भद्रा नाही. चंद्रग्रहण सायंकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी समाप्त होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजून ४६ मिनिटे ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदोषकाळात होलिका दहन करता येईल.
होलिका पूजेसाठी आवश्यक साहित्य
होलिका पूजनासाठी खालील साहित्य ठेवावे -
नारळ
चंदन
अक्षता
फुले
कच्चे सूत (दोरा)
तूप
कापूर
दूध
हंगामी फळे
नवीन पिके (गव्हाची कणसे इ.)
सात प्रकारचे घरगुती पदार्थ (नैवेद्य)
होलिका पूजन पद्धत
१. पूजेच्या वेळी तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे.
२. नरसिंह आणि प्रह्लाद यांना नमस्कार करून पूजनास सुरुवात करावी.
३. होलिकेला पाणी, दूध आणि तूप अर्पण करावे.
४. चंदन, अक्षता आणि फुले वाहावीत.
५. नारळ, हंगामी फळे आणि नवीन पिके अर्पण करावीत.
६. सात प्रकारचे घरगुती पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावेत.
७. शेणाच्या गोवऱ्यांवर आणि लाकडावर तूप व कापूर ठेवून अग्नी प्रज्वलित करावा.
८. “होलिकाय नमः” म्हणत तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
९. शेवटी नमस्कार करून कुटुंबाच्या मंगलकामना कराव्यात.
नैवेद्य आणि परंपरा
अनेक ठिकाणी नवीन गव्हाचे कणसे, उबटन, गोड पदार्थ आणि पुरणपोळी यांचा नैवेद्य दाखवला जातो. होलिका दहनानंतरची राख शुभ मानली जाते. ती कपाळावर लावल्यास वर्षभर आरोग्य आणि संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे.
होलिका दहनाचे आध्यात्मिक महत्त्व
होलिका दहन हा वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगुलपणाचा विजय याचे प्रतीक आहे. मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हा विधी केला जातो. श्रद्धा आणि शास्त्रानुसार मुहूर्त यांचा संगम साधून केलेले होलिका दहन अधिक फलदायी मानले जाते.
यंदा भद्रा आणि चंद्रग्रहणामुळे मुहूर्त अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे योग्य वेळ, पूजासाहित्य आणि पद्धत यांची माहिती घेऊनच होलिका दहन करावे. श्रद्धा, शास्त्र आणि संयम यांची सांगड घातल्यास होळीचा सण अधिक मंगलमय ठरेल.