

पावसाळा म्हटलं की गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत भजी हे समीकरण ठरलेलंच. त्यातही बटाटा-कांदा भजी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. मात्र, घरी भजी बनवताना ती अनेकदा मऊ पडतात किंवा हवी तशी कुरकुरीत होत नाहीत. अशावेळी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास प्रत्येक वेळी बाजारासारखी खुसखुशीत भजी तयार करता येतात. जाणून घेऊया या खास टिप्स आणि सोपी रेसिपी.
साहित्य :
२ मोठे कांदे (पातळ चिरलेले)
१ मोठा उकडलेला व कुस्करलेला किंवा किसलेला बटाटा
१/२ कप बेसन
१ टेबलस्पून रवा किंवा तांदळाचे पीठ
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
१ टीस्पून कसुरी मेथी
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
चिमूटभर हिंग
१ टीस्पून भरड धणे
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
ऐच्छिक – १ टीस्पून लिंबाचा रस
कृती :
कांदे सोलून धुवा आणि लांब, पातळ काप करून घ्या. एका मोठ्या भांड्यात बटाटा, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कसुरी मेथी, धणेपूड, लाल तिखट, अनारदाणा, हिंग, भरड धणे आणि मीठ एकत्र मिसळा.
आता बेसन, रवा किंवा तांदळाचे पीठ घाला. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. आवडत असल्यास लिंबाचा रस घाला. कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे-छोटे भाग तेलात सोडा.
भजी मध्यम आचेवर तळा. जास्त आचेवर तळल्यास बाहेरून रंग येतो, पण आतून भजी कुरकुरीत होत नाहीत. सोनेरी रंग आल्यावर भजी बाहेर काढा. वरून चाट मसाला भुरभुरवा आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
कुरकुरीत भजी बनवण्यासाठी टिप्स
१. बटाट्याचे तुकडे न करता किसून किंवा उकडून वापरा
भजीसाठी बटाट्याचे मोठे तुकडे वापरण्याऐवजी तो किसून किंवा उकडून कुस्करून वापरा. त्यामुळे मिश्रण व्यवस्थित एकजीव होते आणि भजी अधिक कुरकुरीत बनतात.
२. कांदा पातळ चिरा
कांदा नेहमी लांब आणि पातळ चिरावा. जाड काप असल्यास तो नीट शिजत नाही आणि भजी मऊ पडू शकतात.
३. बेसनात रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा
बेसनामध्ये थोडासा रवा किंवा तांदळाचे पीठ घातल्यास भजींना बाहेरून छान कुरकुरीत पोत मिळतो.
४. आधी भाज्या आणि मसाले एकत्र करा
बटाटा, कांदा, कोथिंबीर, आले-लसूण, हिरवी मिरची आणि मसाले आधी व्यवस्थित मिसळा. त्यानंतरच बेसन घाला. यामुळे मसाल्यांचा स्वाद सर्वत्र समान पसरतो.
५. बेसन शेवटी घाला
मिश्रणात सुरुवातीलाच जास्त बेसन घालू नका. आवश्यक तेवढेच बेसन शेवटी मिसळल्यास भजींची चव टिकून राहते आणि त्या पिठाळ लागत नाहीत.
लक्षात ठेवा...
भजी तळताना कढईत एकावेळी जास्त भजी टाकू नका. गरमागरम चहा, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर ही भजी अधिक स्वादिष्ट लागतात. पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा झटपट आणि चविष्ट पर्याय ठरू शकतो.