

हिवाळ्यात थंडी वाढली की, अनेकांना पायांच्या तळव्यांमध्ये कोरडेपणा, भेगा पडणे, खाज सुटणे किंवा जळजळ अशा समस्या जाणवू लागतात. मॉइश्चरायझरच्या अभावामुळे हा त्रास अधिक वाढतो. मात्र, काही सोप्या उपायांनी हिवाळ्यात तळव्यांची योग्य काळजी घेता येऊ शकते.
पाय कोमट पाण्याने धुवा
तज्ज्ञांच्या मते, दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवून नीट कोरडे करावेत. त्यानंतर नारळ तेल, बदाम तेल किंवा व्हॅसलिनसारखे मॉइश्चरायझर लावून सूती मोजे घालावेत. यामुळे त्वचेला पुरेसा ओलावा मिळतो आणि भेगा पडण्याची शक्यता कमी होते.
मृत त्वचा काढून टाका
आठवड्यातून एकदा पाय स्क्रब करणे देखील फायदेशीर ठरते. साखर व नारळ तेलाचा नैसर्गिक स्क्रब किंवा प्यूमिक स्टोन वापरून मृत त्वचा काढून टाकल्यास तळवे मऊ राहतात. तसेच, जास्त वेळ गरम पाण्यात पाय ठेवणे टाळावे, कारण यामुळे त्वचा अधिक कोरडी होते, असे तज्ज्ञ सांगतात.
हिवाळ्यातही होतील तळवे मऊ
तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात बंद आणि आरामदायक चपला वापरणे, तसेच पाय स्वच्छ व कोरडे ठेवणे आवश्यक आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी तळव्यांची विशेष काळजी घ्यावी, कारण त्यांच्या तळव्यांना भेगा लवकर पडण्याचा धोका असतो. वेळेवर योग्य काळजी घेतल्यास थंडीमध्येही तळवे मऊ आणि निरोगी राहू शकतात.