मुंबई : सणासुदीतील मोठ्या प्रमाणावरील व्यवहारांमुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत सातत्याने वाढ झाल्यामुळे सप्टेंबर तिमाहीत आलेल्या मंदीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, असा आशावाद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मंगळवारी बुलेटिनमध्ये व्यक्त केला आहे.
डिसेंबरच्या बुलेटिनमधील ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ वरील लेखात नमूद केले की, जागतिक अर्थव्यवस्था स्थिर वाढ आणि मध्यम किरकोळ महागाईसह लवचिकता प्रदर्शित करत आहे. तर २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी उच्च वारंवारता निर्देशक (HFIs)) सूचित करतात की भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीमधील मंदावल्यानंतर आता सणासुदीच्या काळातील मजबूत खरेदीमुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत सतत वाढ होत असल्याने भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, असे त्यात म्हटले आहे.
आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने लिहिलेल्या लेखात रब्बीच्या उत्तम पेरणीमुळे शेतीसाठी आणि त्यामुळे ग्रामीण भागातील खरेदीच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.
चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या कालावधीत भारताचा जीडीपी वाढ सात-तिमाहीतील नीचांकी ५.४ टक्क्यांवर आला. तथापि, आरबीआयने म्हटले आहे की, बुलेटिनमध्ये व्यक्त केलेले विचार लेखकांचे आहेत आणि ते मध्यवर्ती बँकेच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.