मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना पोटदुखी, कंबरदुखी आणि अंगदुखीचा त्रास होतो. काही वेळा ही वेदना इतकी तीव्र असते की दैनंदिन कामांवरही परिणाम होतो. पाळीच्या वेदनांमागे शरीरात तयार होणारे प्रोस्टाग्लँडिन नावाचे रसायन कारणीभूत असते. मात्र काही साधे उपाय केल्यास या वेदना कमी करण्यास मदत होऊ शकते. योग्य उपचार, मसाज आणि आहारातील बदल यामुळे पाळीच्या वेदनांवर नियंत्रण मिळवता येते.
पोटाला उब द्या
पोटावर किंवा कंबरेवर उब देणे हा पाळीतील वेदना कमी करण्याचा प्रभावी उपाय मानला जातो. हॉट वॉटर बॉटल, हीटिंग पॅड किंवा गरम टॉवेल वापरल्याने स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होतात. गरम पाण्याने अंघोळ केल्यानेही शरीराला आराम मिळतो.
तेलाने मसाज करा
पोट, कंबर आणि बाजूच्या भागावर हलक्या हाताने २० मिनिटे मसाज केल्याने वेदना कमी होऊ शकतात. बदाम तेल, खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाने मसाज केली तर आराम मिळू शकतो.
शरीर रिलॅक्स ठेवा
तज्ञांच्या मते, शरीर रिलॅक्स राहिल्यास वेदना जाणवण्याची तीव्रता कमी होऊ शकते. एंडॉर्फिनसारखे हॅपी हार्मोन्स शरीरात तयार झाल्यास वेदनांची जाणीव कमी होते. त्यामुळे पाळीच्या काळात ताण कमी ठेवणे आणि शरीराला विश्रांती देणे महत्त्वाचे ठरते.
काही पदार्थ टाळा
पाळीच्या काळात काही पदार्थ खाल्ल्याने पोट फुगून अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे तेलकट-तुपकट पदार्थ, कॅफिन, अल्कोहोल, सोडा ड्रिंक्स आणि जास्त मीठ असलेले पदार्थ टाळणे फायदेशीर ठरते. त्याऐवजी आले किंवा पुदिन्याचा गरम चहा, लिंबूपाणी किंवा फळांचे सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो.
जर पाळीतील वेदना वारंवार तीव्र होत असतील किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास मासिक पाळीचा काळ अधिक आरामदायी होऊ शकतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)