श्रावण सुरू झाला की उपवासांची मालिकाच सुरू होते. श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार अशा विविध दिवशी अनेक जण उपवास करतात. काही जण तर संपूर्ण श्रावणात दिवसातून एकदाच जेवतात. त्यामुळे उपवासाच्या काळात थकवा, अशक्तपणा आणि एनर्जी कमी झाल्यासारखं वाटू शकतं. अशावेळी घरच्या घरी तयार होणारं हे साधं पेय ट्राय करता येईल.
साहित्य
१ ग्लास नारळपाणी
१ चमचा पाण्यात भिजवलेले सब्जाचे बी
थोडी ताजी नारळाची मलई
थोडं लिंबू
कृती
सर्वप्रथम एका ग्लासमध्ये नारळपाणी घ्या. त्यात पाण्यात भिजवलेले सब्जाचे बी घाला. त्यानंतर ताजी नारळाची मलई आणि थोडा लिंबाचा रस मिसळा. सर्व साहित्य नीट एकत्र करा. उपवासाच्या दिवशी हे ताजं पेय घेता येईल.
नारळपाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, तर सब्जामध्ये फायबर असते. त्यामुळे हे पेय शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत करू शकतं. नारळाची मलई आणि लिंबामुळे चवही छान येते.
उपवास करताना थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मात्र सतत चक्कर येणे, जास्त अशक्तपणा जाणवणे किंवा इतर त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.