अलीकडच्या काळात वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यापैकी एक म्हणजे ‘वॉटर फास्टिंग’. काही जणांच्या मते, काही दिवस फक्त पाणी पिऊन वजन झटपट कमी करता येतं. ऐकायला सोपं वाटणारं हे तंत्र अनेकांना आकर्षित करतं. पण हा उपाय खरंच सुरक्षित आहे का, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
वॉटर फास्टिंग म्हणजे ठराविक कालावधीसाठी कोणताही आहार न घेता केवळ पाणी पिणं. हा कालावधी काही तासांपासून काही दिवसांपर्यंत असू शकतो. मात्र या प्रक्रियेदरम्यान शरीरात मोठे बदल घडतात.
पहिल्या २४ तासांत
सुरुवातीला शरीर साठवून ठेवलेल्या ग्लुकोजचा वापर करतं. हा साठा संपत आल्यावर भूक वाढणे, चिडचिड, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
२ ते ३ दिवसांनंतर
ग्लायकोजनचा साठा संपल्यावर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबी वापरू लागतं. या प्रक्रियेला ‘कीटोसिस’ म्हणतात. यामुळे वजन जलद कमी होतं, पण त्यासोबत चक्कर, थकवा आणि तोंडाला दुर्गंधी यांसारख्या समस्या दिसू शकतात.
३ दिवसांनंतर
दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे शरीर ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतं आणि मेटाबॉलिझम मंदावतो. अशावेळी शरीर स्नायूंमधील प्रोटीन वापरू लागतं, ज्यामुळे कमजोरी आणि लो ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते.
अनेकजण वॉटर फास्टिंगमुळे शरीर डिटॉक्स होतं असा दावा करतात. मात्र शरीरात लिव्हर आणि किडनी या अवयवांमुळे नैसर्गिकरित्या डिटॉक्स प्रक्रिया चालू असते. वॉटर फास्टिंगमुळे ती अधिक प्रभावी होते, याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
शरीरात पोषक घटकांची कमतरता
इलेक्ट्रोलाइट्सचा असंतुलन
डिहायड्रेशन
चक्कर येणे, अशक्तपणा
हार्मोनल बदल
वॉटर फास्टिंगमुळे सुरुवातीला वजन कमी होतं, मात्र नियमित आहार सुरू केल्यानंतर ते पुन्हा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हा दीर्घकालीन उपाय ठरत नाही.
तज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हेच सर्वात प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहेत.
वॉटर फास्टिंगसारखे प्रयोग स्वतःहून करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज वेगळी असते, त्यामुळे अंधाधुंद ट्रेंड फॉलो करणं टाळावं.
(Disclaimer : या लेखातील माहिती ही सार्वजनिक स्रोत आणि तज्ज्ञांच्या सर्वसाधारण मार्गदर्शनावर आधारित आहे. ‘नवशक्ति’ या माहितीची अचूकता किंवा परिणामकारकता याची हमी देत नाही. कोणतीही नवीन दिनचर्या, आहार किंवा आरोग्यविषयक सवय सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)