अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होत असते. सकाळचा पहिला घोट घेतल्याशिवाय अनेकांचा दिवसच सुरू होत नाही. मात्र हा रोजचा चहा जर चुकीच्या पद्धतीने बनवला, तर तो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, चहा बनवताना होणारी एक सामान्य चूक चहाला विषारी बनवू शकते. ज्यामुळे पित्त, ॲसिडिटी, जळजळ, डोकेदुखी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढू शकतात.
नेमकी काय चूक केली जाते?
अनेकजण चहा बनवताना पाणी आणि चहापावडर खूप वेळ उकळतात किंवा आधी पाणी व चहापावडर जास्त वेळ उकळून नंतर दूध घालतात. मात्र चहापावडर जास्त वेळ उकळल्याने त्यातील टॅनिन (Tannin) हे घटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. हेच टॅनिन पोटातील आम्लता वाढवून पित्त, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरते.
चहा कसा बनतो विषारी?
तज्ज्ञांच्या मते, चहा जास्त वेळ उकळणे किंवा वारंवार गरम करणे हे आरोग्यासाठी अपायकारक ठरते. अशा चहामधील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात आणि आम्लीय घटक वाढतात. परिणामी, चहा आरोग्यदायी न राहता पोटासाठी त्रासदायक ठरतो.
पित्त व ॲसिडिटी न होणारा चहा कसा बनवायचा?
चहा सोडायचा नसेल, तर तज्ज्ञांनी सुचवलेली योग्य पद्धत वापरणे फायदेशीर ठरू शकते.
आधी पाणी उकळवा.
पाणी उकळल्यानंतर गॅस मंद करा.
त्यात चहापावडर घालून फक्त १ ते २ मिनिटे उकळू द्या.
त्यानंतर दूध घालून लगेच गॅस बंद करा.
चहा जास्त वेळ उकळू देऊ नका.
चहामध्ये आले किंवा वेलची घाला.
आले पचन सुधारते आणि गॅस व ॲसिडिटी कमी करते.
वेलची पोट थंड ठेवते आणि पित्त शांत करते.
'या' चुका टाळा
रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. शक्य असल्यास थोडा नाश्ता केल्यानंतरच चहा घ्यावा. तसेच दिवसाला २ ते ३ कपांपेक्षा जास्त चहा पिणे टाळा. चहा चुकीच्या पद्धतीने बनवला तर तो पित्त आणि ॲसिडिटी वाढवू शकतो. मात्र योग्य पद्धत आणि काही उपयुक्त मसाल्यांचा वापर केला, तर हाच चहा आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतो.