मागील अनेक महिण्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय सुरूचं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभर सध्या कुणबी नोंदी शोधण्याच काम जोराने सुरु आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी येत असलेला माणूस द्या, अन्यथा बुधवारपासून सरकारी कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा माळशिरस येथील मराठा समाजातील आंदोलकांनी दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम आता ठप्प झाल्याने मराठा आंदोलक संतप्त झाले आहेत. त्यांनी माळशिरस तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन केले आहे. संपूर्ण राज्यभर सध्या मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम वेगाने सुरु असताना माळशिरस तालुक्यात फक्त मोडी लिपी वाचणारा माणूस शासनाने न दिल्याने नोंदी शोधणे आता अवघड होऊ लागले आहे.
त्यामुळे आज माळशिरस तहसील कार्यालयावर संतप्त मराठा आंदोलकांनी बोंबाबोंब आंदोलन केलं आहे. प्रशासनाने तातडीने मोडी लिपी वाचणाऱ्या माणसाची नेमणूक करावी, अन्यथा सरकारी कामकाज अजिबात चालू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण कृती समिती समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे.
मराठा समाजाचे की अन्य समाजाचे सर्व्हेक्षण या वादावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत शुक्रवारी पडदा पडला आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार आता मराठा समाजाचे संपूर्ण सर्व्हेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याबाबत राज्य सरकारच निर्णय घेईल, असे आयोगाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.