महाराष्ट्र

भोसरी भूखंड प्रकरण : मंदाकिनी खडसे यांना दिलासा

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी केली होती

नवशक्ती Web Desk

मुंबई : भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला.विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या गुन्ह्यात एकनाथ खडसे यांना दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचा सशर्त जामीन मंजूर केला.

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी केली होती. त्या तक्रारीच्या आधारे बंड गार्डन पोलिस ठाण्यात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडसे यांनी मंत्री असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भोसरी परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची ४० कोटी रुपयांची जमीन पत्नी आणि सुनेच्या नावे ३.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला.या प्रकरणात ईडीने चौकशी सुरू करीत २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

या जामीन अर्जावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहिर करताना त्यांना मोठा दिलासा दिला. न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना २ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. याचवेळी त्यांना पुराव्यांमध्ये छेडछाड करू नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशा अटी घातल्या आहेत.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले