छत्रपती संभाजीनगर : देशभरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) पुढील महिन्यात 'क्या बोलती पब्लिक' हे राष्ट्रव्यापी अभियान सुरू करणार आहे, अशी माहिती 'सीजेपी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी गुरुवारी दिली.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या पक्षाच्या कोअर टीमच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशामध्ये शिक्षण आणि बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे पुढे आणून राजकीय चर्चेची दिशा बदलणे आणि एक प्रभावी दबाव गट म्हणून काम करणे हा पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत अभिजित दिपके यांची पक्षाचे संयोजक म्हणून, तर मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि प्रवक्ते आशुतोष रंका यांची सह-संयोजक म्हणून निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
गेल्या १०-१२ वर्षांत सरकारने लोकांच्या मनात निर्माण केलेली भीती आता संपली आहे. देशातील तरुणांना त्यांचा आवाज परत मिळाला आहे. आज लोकांनी एका मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे, उद्या ते इतरांच्या राजीनाम्याचीही मागणी करतील, असेही त्यांनी नमूद केले.
दीपके यांच्या घरासमोर निदर्शने
पत्रकार परिषदेदरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला. "दिल्लीतील आंदोलनात आम्ही सहभागी झालो, मग पक्षाच्या बैठकीत आम्हाला का बोलावले नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित करत घोषणाबाजी केली.घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोकांचे ऐकून घेण्याची गरज
‘क्या बोलती पब्लिक’ या अभियानादरम्यान आम्ही देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल आणि लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल थेट जनतेशी संवाद साधू. आता जनतेचे ऐकून घेण्याची वेळ आली आहे. पूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जेन-झींची पिढी भविष्यात देश चालवणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाऊ नये, असे ते म्हणाले.