मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली. यात अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे, तर एकाच घरात दोघांना तिकीट दिल्याने भाजपमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मंडळींनी सोमवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर गर्दी केली होती. दरम्यान, नाराजांची समजूत काढण्यात आल्याचे भाजपमधील वरिष्ठ नेत्याने सांगितले.
भाजपची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. या पहिल्या यादीत अनेक इच्छुकांना डावलल्याने भाजपमधील नाराजी उफाळून आली. तिकीट इच्छुक, नाराज आणि तिकीट मिळालेले सर्वच उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले. पुण्यातील खडकवासलाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर, मावळचे आमदार सुनील शेळके, विरोधातील भाजपचे बाळा भेगडे, अंधेरी पूर्व येथील इच्छुक मुरजी पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ बंगल्यावर भेट घेतली.
मुंबईतील इच्छुकांची मोर्चेबांधणी
मुंबईतील भाजपच्या १४ जागा जाहीर झाल्या आहेत. मात्र, वर्सोवा आणि घाटकोपर पूर्व मतदारसंघ ‘वेट अँड वॉच’वर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वर्सोवा मतदारसंघातील आमदार भारती लव्हेकर या फडणवीस यांच्या भेटीला आल्या होत्या, तर बोरिवलीतील सुनील राणेही ‘सागर’ बंगल्यावर आले होते. मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शहाही फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले होते.
मुलालाही उमेदवारी द्यावी!
बबनराव पाचपुते हे त्यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासह ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले होते. प्रतिभा पाचपुते यांना भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर झाली. मात्र, मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून दोघेही आग्रही आहेत.