"मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आणि फक्त मतांसाठी मत बदलणारे..."; ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल 
महाराष्ट्र

"मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आणि फक्त मतांसाठी मत बदलणारे..."; ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचं कारण म्हणजे, ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त मतांसाठी...

किशोरी घायवट-उबाळे

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२४) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु होती. अखेर आज घोषणा करत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केले. "फक्त मतांसाठी मत बदलणारे आणि मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आम्ही नाही." असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंवर केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले याचा मला आनंद आहे. पण ते एकत्र आल्यामुळे फार काहीतरी वेगळं घडेल, राजकीयदृष्ट्या काही बदलेल असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. मी आपलं सहज टीव्ही सुरु होता म्हणून पाहिलं. टीव्हीवर तर असं दाखवलं जात होतं, जणू काही रशिया आणि युक्रेनची युती होतेय. अखेर एकत्र आले आहेत. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतिन निघाले आणि दोघांची युती झाली. मला असं वाटतं की कुठल्याही एका पक्षाला निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी जे करायचं असतं ते त्यांनी केलं. त्याचा फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. कारण; मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे. मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलं आहे. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा आहे. मराठी माणूस यांच्यासोबत नाहीये. यांनी अमराठींवर हल्ले केले त्यामुळे तेही यांच्यासोबत नाहीयेत."

पुढे ते म्हणाले, "निवडणूका आल्या की भावनिक बोलायचं पण भावनिक बोलण्याला जनता भुलणार नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी अजून दोन-तीन जणांना त्यांनी सोबत घेतलं तरीही मुंबईकर फक्त महायुतीचं काम बघून आणि मुंबईचा विकास बघून मतं देतील. महायुतीने विशेषतः मराठी माणसाला मुंबईत घरं देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्यामुळे निश्चितपणे मुंबईकर महायुतीच्या पाठिशी मुंबईकर उभे राहतील," असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी जागावाटप आणि आकड्यांबाबत पत्रकार परिषदेत काही माहिती दिली नाही. यावर फडणवीस म्हणाले, "असं आहे की आकड्याशी माझा काही संबंध नाही, ते कुठे आकडे लावतात याच्यात मला रस नाही."

पुढे ते म्हणाले, "अस्तित्वाच्या संकटाचा सामना करणारे दोन पक्ष, वेळोवेळी त्यांच्या भूमिका बदलणारे आणि लोकांचा अविश्वास मिळवणारे दोन पक्ष, त्यांनी त्यांची मतपेढी गमावली आहे, ते त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. जर ते त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी आले तर ते निवडणुका जिंकू शकत नाहीत. ते संधीसाधूपणाचे राजकारण करत आहेत. मुंबई आमच्यासोबत आहे, सोबत राहील आणि महायुतीचा विजय होईल. बाळासाहेब ठाकरेंनंतर आता उद्धव आणि राज यांच्याकडे कोणताही विचार शिल्लक राहिला नाही. या दोन्ही भावांकडे कोणतीही विचारसरणी शिल्लक नाही. विचारांच्या वारशाला त्यांनी गाडून टाकलं आहे." अशी टीका फडणवीसांनी केली.

"ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे महाराष्ट्र नाही, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हा त्यांचा दुराभिमान आहे. तो मुंबईकरांना नकोय. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. उद्धव ठाकरे जर विकासावर बोलले तर मी हजार रुपये देईन, असं मी बोललो होतो. पण अजूनही माझे हजार रुपये वाचले आहेत. कारण ते विकासावर बोलू शकत नाही. ते बोलणारही नाहीत. कारण; त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागेल. त्यांनी स्क्रिप्ट बदलायला हवी. परत-परत तेच बोलत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आहे, पण ही पलटी सुखामय आहे." असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

पुढे फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "अख्ख्या दुनियेला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस हिंदू म्हणून जन्मला आणि हिंदू म्हणून मरणार आहे. फक्त मतांकरिता भगवी शाल पांघरणारे आम्ही नाही. फक्त मतांसाठी मत बदलणारे आम्ही नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हिंदुत्ववादी आहे. आमचं हिंदुत्व व्यापक आहे, आणि आम्ही पलटी मारणारे नाहीत."

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यांनी राजकीय वाद ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune : जेजुरीत दिंडीच्या ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

बँकॉकमधील पबला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर, Video

'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल

'श्रीलंका' ठरले भारतीय लग्नांचे नवे हॉटस्पॉट; पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम; लोकप्रियतेत २५ टक्क्यांची वाढ

अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजय वैती अपात्र; खोटी माहिती देऊन निवडणूक लढवल्याचा ठपका