मुंबई : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली असून तपासावर राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप करत तिरोडकर यांनी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाला प्रतिवादी बनवून मंत्री मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रात वाल्मिक कराडसोबत असलेल्या कंपन्यांचा उल्लेख न केल्याबद्दल कारवाई करण्याची विनंती केली आहे.
मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या वेंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्विसेस, जगमित्र शुगर मिल्स आणि परळी डेअरी या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप याचिकेत करताना याबाबतच्या तपासासाठी ईडीमार्फत समांतर तपास सुरू करावा, अशी मागणी केली आहे.