मुंबई : राज्यात सार्वजनिक आरोग्याचे हित आणि अन्न सुरक्षा नियमांच्या व्यापक उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ‘ॲनालॉग’ म्हणजेच बिगर-दुग्धजन्य (बनावट) पनीरच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट जन्मठेपेची शिक्षा आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कठोर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. छत्तीसगढनंतर अशी बंदी लादणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स आणि खाद्यपदार्थ विक्रेते पारंपरिक दुग्धजन्य पनीरऐवजी या अॅनालॉग पनीरचा वापर करत असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, मेनू कार्ड, इनव्हॉइस किंवा डिस्प्ले बोर्डवर याबाबत ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नव्हती.
ॲनालॉग पनीर हे दुधाच्या फॅटऐवजी वनस्पती तेल, स्टार्च, इमल्सीफायर्स आणि इतर रसायनांचा वापर करून तयार केले जाणारे बिगर-दुग्धजन्य पनीर आहे. हे पनीर पारंपरिक पनीरपेक्षा उत्पादनासाठी अतिशय स्वस्त असते आणि त्यात प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी असते.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)