उसनवारीबाबत दोन नोटिसा; मंत्री कार्यालयांचा प्रतिसाद नाही संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

उसनवारीबाबत दोन नोटिसा; मंत्री कार्यालयांचा प्रतिसाद नाही

विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमधील उसनवार कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याबाबत मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशाबाबत बरीच नाराजी असल्याचे कळते. याबाबत दोनदा नोटिसा काढूनही मंत्री कार्यालयांनी यासंबंधीचा अहवाल सादर केलेला नाही.

Swapnil S

मुंबई : विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमधील उसनवार कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याबाबत मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशाबाबत बरीच नाराजी असल्याचे कळते. याबाबत दोनदा नोटिसा काढूनही मंत्री कार्यालयांनी यासंबंधीचा अहवाल सादर केलेला नाही.

सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री सचिवालयासह मंत्री आणि राज्यमंत्री कार्यालयासाठी    प्रतिनियुक्तीची एकूण ९०४ पदे मंजूर केली आहेत. त्यापैकी ५४९ पदांवर नियुक्ती झाली असून तब्बल ३५५ पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीच्या या रिक्त पदांवर उसनवारी तत्वावर किंवा तोंडी आदेशाने नियमबाह्य नियुक्त्या झाल्याचा सामान्य प्रशासन विभागाला संशय आहे.

उसनवारी पद्धतीने आणि तोंडी आदेशाने    मंत्री आस्थापनेला चिकटून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने २५ ऑगस्ट रोजी परिपत्रक जारी केले आहे. कारण नियमात उसनवारी किंवा तोंडी आदेशाने कर्मचारी नियुक्तीची तरतूद नाही.

विभागाने या परिपत्रकाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्री कार्यालयांना २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर अशी दोन वेळा    नोटीस बजावली आहे. परिपत्रकानुसार    कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री कार्यालयांना दिल्या आहेत. मात्र, त्याला मंत्री कार्यालयांनी अद्याप प्रतिसाद दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सामान्य प्रशासन विभागाचे नियम धाब्यावर बसवून अनेक मंत्र्यांनी आपल्या कार्यालयात मर्जीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहाय्यक या पदांवर वर्णी लावली आहे. बहुसंख्य मंत्र्यांकडे मंजूर पद संख्येपेक्षा दुप्पट-तिप्पट कर्मचारी कार्यरत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाची मान्यता नसताना काही अधिकारी हे खासगी सचिव म्हणून कॅबिनेट मंत्र्यांकडे काम करत असून ते विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देताना आढळून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्री आस्थापनेवर नियमबाह्यपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात धाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी शासन परिपत्रक काढण्यात आले.

शासन परिपत्रकात काय

१० सप्टेंबर २०२६ पूर्वी उसनवारी तत्त्वावरील आणि तोंडी आदेशाने नियुक्त कर्मचाऱ्यांना मूळ विभागात पाठवा. अशा अधिकारी -कर्मचाऱ्यांचे मंत्रालयीन प्रवेश पत्र जमा करून चेहरा पडताळणी सुविधा बंद करावी.  सदर कर्मचारी मूळ विभागात हजर न झाल्यास त्यांचे वेतन बंद करणार.

शासन निर्णयानुसार मंजूर पदसंख्या

शासन निर्णयानुसार १४ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री सचिवालयासाठी १६४, उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी ७२ तर मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या कार्यालयासाठी अनुक्रमे १६ आणि १४ पदे मंजूर आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी

मुख्य सचिवांच्या सहीने निघालेल्या परिपत्रकावर गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी या नाराजीची दखल घेतली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मंत्री कार्यालयांनी नियमबाह्य नेमणुका झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांची परत पाठवणीची तयारी सुरू केली आहे. 

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जरांगेंची मोर्चेबांधणी; १२ सप्टेंबरला मराठ्यांना एकत्र येण्याचे आवाहन, पोलीस कारवाई झाल्यास '१० मिनिटांत महाराष्ट्र बंद'

जात प्रमाणपत्रांचा वाद : ७९ प्रकरणे न्यायालयात; ठाकरेंचे २४, तर भाजपचे १६ नगरसेवक अडचणीत

MPSC Paper Leak : विद्यार्थ्यांचा आक्रोश! सततच्या पेपरफुटीविरोधात पुण्यात तीव्र संताप

MPSC Paper Leak : ठोस पुरावा दिल्यास पद सोडणार; भीमनवार यांचे प्रत्युत्तर

धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी; सरकारचा आदेश, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट