मुंबई : विविध जिल्ह्यातील सरकारी धान्य पुरवठ्याचे काम खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याच्या दिशेने राज्य सरकारची पावले पडत असून यामुळे दहा हजार माथाडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर, या निर्णयाच्या विरोधात संबंधित माथाडी कामगारांच्या वतीने २५ आणि २६ मे रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे.
सरकारी धान्य गोदामातील धान्याची चढ-उतार करणे, पोत्याची थप्पी लावणे ही कामे जिल्हा माथाडी मंडळातील नोंदीत कामगार करत असतात. राज्यभरातील या कामगारांची संख्या दहा हजारांहून अधिक आहे. मात्र, आता खासगी ठेकेदारांमार्फत रेशन दुकानांना थेट धान्य पुरवठा करण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडत आहेत.
आता हीच कामे खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून अनोंदित कामगारांकडून करून घेण्याबाबत सरकारने आदेश जारी केले आहेत. यामुळे भविष्यात सरकारी गोदामांमध्ये धान्यच येणार नाही व परिणामी गेली कित्येक वर्षे हे काम करणारे जिल्हा माथाडी मंडळातील नोंदीत कामगार बेरोजगार होण्याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे, अशी भीती अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन सरचिटणीस अरुण रांजणे यांनी व्यक्त केली आहे.
विविध संघटना होणार सहभागी
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ आणि २६ मे रोजी धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या आंदोलनात माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी मंडळ, अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन इत्यादी संघटना सहभागी होणार आहेत.