प्रतिनिधी/मुंबई
शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात. आतातर बेरोजगारांच्या आमत्महत्याही वाढल्या आहेत. पूर्वी महाराष्ट्र उद्योगात आघाडीवर होता, आता तोच महाराष्ट्र गुन्हेगारीत आघाडीवर आहे. कर्जाचा बोजा वाढलाय. त्यामुळे ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्न सत्ताधारी पक्षाला विचारण्याची वेळ आली असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सोडले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील म्हणाले की, “शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था अशा विविध विषयांबाबत सरकार कसे उदासीन आहे, याची आकडेवारी त्यांनी मांडली. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ अशी घोषणा केली. पण राज्यात दररोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. २०२३मध्ये राज्यात २ हजार ८५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या दीड वर्षात बरोजगारीमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. २०२२मध्ये देशात ३ हजार १७० बेरोजगारांनी आत्महत्या केल्या. त्यात महाराष्ट्रातील ६४२ बेरोजगारांचा समावेश आहे.”