पुणे : विदर्भासह देशातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून तीव्र झालेली उष्णतेची लाट आता ओसरू लागली असून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः अकोला आणि अमरावती येथे मंगळवारी ४५.२ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले होते.
गेल्या आठवड्यात विदर्भातील अनेक ठिकाणी तापमान ४७ अंशांच्या जवळ पोहोचले होते. वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर ही शहरे देशातील सर्वाधिक उष्णतेच्या केंद्रांमध्ये गणली जात होती. मात्र सध्या महाराष्ट्रावर चक्रवाती वारे सक्रिय झाल्यामुळे वातावरणात बदल होत असून पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यानुसार बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बुधवार-गुरुवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी काही जिल्ह्यांमध्ये ही शक्यता कायम राहणार आहे.
दरम्यान, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड येथेही उष्णतेची लाट ओसरली असून काही भागांत पावसाचा अंदाज आहे. मात्र राजस्थान मध्ये अद्याप उष्णतेची तीव्रता कायम आहे. तसेच ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी उच्च तापमानाची नोंद झाली. पुणे येथे ३९.७ अंश, जळगाव ४४ अंश, नाशिक ३८.७ अंश, तर सोलापूर येथे ४३.६ अंश तापमान नोंदवले गेले. मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान तुलनेने कमी राहून सुमारे ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान होते.