महाराष्ट्र

Maharashtra Elections: उल्लंघन केल्यास १०० मिनिटांत कारवाई; C-Vigil App वर तक्रार करा, आयोगाचे आवाहन

राज्यात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच सी व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करताच पुढील १०० मिनिटांत तक्रारीचे निवारण होईल, असा दावा राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच सी व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करताच पुढील १०० मिनिटांत तक्रारीचे निवारण होईल, असा दावा राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.

राज्यातील आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये याविषयी उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. मात्र काहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता अधिक सुलभ झाल्याचे मानले जात आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाने सी व्हिजिल अ‍ॅप विकसित केले आहे.

मोबाईल अ‍ॅपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. सी व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई करण्याची सुविधा आहे. सी व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

तक्रारीबाबतची माहिती मिळणार

सी व्हिजिल अ‍ॅप हे वापरकर्त्यांना आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी विकसित केले आहे. निवडणूक प्रक्रियेत नागरिकांच्या सहभागासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. उल्लंघन नेमके कुठे झाले त्यासाठी जीपीएसचा वापर करण्यात येतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची परवानगी आहे. तक्रारीबाबतची माहिती घेण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये आहे.

असे डाऊनलोड करा अ‍ॅप

एन्ड्रॉईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील अ‍ॅप स्टोअर या अ‍ॅपमध्ये जाऊन सी व्हिजिल सर्च करावे. त्यानंतर अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यानंतर अ‍ॅप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करून खाते तयार करा. ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडून स्थळ, वेळ आणि छायाचित्र किंवा व्हीडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रारीची नोंद करायची आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली