Sindhudurg : परजिल्ह्यातील व्यक्तींना जमीन विक्रीवर निर्बंध; मुणगे ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Sindhudurg : परजिल्ह्यातील व्यक्तींना जमीन विक्रीवर निर्बंध; मुणगे ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण निर्णय

देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गावातील शेती आणि निवासी जमिनींच्या विक्रीबाबत महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

Swapnil S

देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गावातील शेती आणि निवासी जमिनींच्या विक्रीबाबत महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या ठरावानुसार मुणगे ग्रामपंचायत हद्दीतील जमीन परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्ती, संस्था आणि कंपन्यांना विक्री करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

मुणगे गावातील शेती आणि निवासी जमीन हा गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, अलीकडच्या काळात परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी केली जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. भविष्यात या जमिनी मोठ्या प्रकल्पांसाठी हस्तांतरित होण्याची शक्यता असून, त्यामुळे गावाच्या पारंपरिक स्वरूपावर तसेच स्थानिकांच्या हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, कणकवली तालुक्यातील असलदे गावानेही अशाच स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. असलदे येथे झालेल्या ग्रामसभेत परप्रांतीयांना गावातील जमीन विक्री करू नये, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनींचे संरक्षण आणि गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक अस्तित्वाच्या जतनासाठी कोकणातील ग्रामसभांमधून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असल्याचे चित्र आहे.

ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर

गावाचे हित, सुरक्षितता आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा ठराव घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एखाद्या नागरिकाला अपवादात्मक परिस्थितीत आपली जमीन विक्री करायची असल्यास प्रथम गावातील स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे. तसेच जमीन विक्रीची माहिती ग्रामपंचायतीला देण्यात यावी, असेही ठरावात नमूद करण्यात आले आहे. विशेष ग्रामसभेत मांडण्यात आलेला हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर जमीन आणि गावाच्या भविष्यातील विकासाबाबत जनजागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंत्रालयातील दूषित पाणीप्रश्नी समिती गठित; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश

Mumbai : अनधिकृत बांधकामांवर आता AI ची नजर; तिवाना यांची ठरावाची सूचना सभागृहात मंजूर

Thane : शाळांसमोर पानटपऱ्या, अमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू, महासभेत नगरसेवकांचा संताप

Mumbai : पालिका सभागृहात आरोग्य सुविधांवर भर; महापौर वैद्यकीय निधी कक्ष सुरू होणार

Mumbai : बनावट जन्मदाखल्याचा फटका सर्वसामान्यांना; विदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी, सभागृहात प्रशासनावर सर्वपक्षीय टीका