मुंबई : राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्याथ्यांपैकी ९३.५१ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते.
शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
शिक्षण विभागाने प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन असे एकूण ८१६ आधार संच उपलब्ध करून दिलेले आहेत. विविध माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आवश्यक दुरुस्ती दोन्ही कामे सध्या गटस्तरावर सुरू आहेत. तथापि, आधार प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे पडताळणी प्रलंबित राहत आहे. बालकांचे पाचव्या वर्षी व पुन्हा पंधराव्या वर्षी आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. तसेच सर्व शाळांनाही आवाहन करण्यात आले आहे.
७ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध
राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून २ कोटी ४ लाख ६३ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ५ सप्टेंबर रोजीपर्यंत यापैकी १ कोटी ९१ लाख ३५ हजार २९६ विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरली आहेत. उर्वरित पाच लाख २७हजार ६०२ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत, तर ६३ हजार ९ विद्यार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे. तसेच, ७ लाख ३७ हजार ४८५ विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरले आहेत.