मुंबई : भरवेगात माेटारसायकल चालविताना नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दीपक संदीप साखरे (२६) या माेटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातास तोच जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता भोईवाडा येथील तकिया मशीद सिग्नलसमोरील गतिरोधकाजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दीपक हा भोईवाडा येथील विठ्ठल चव्हाण मार्गावरील बीएमसी वसाहतीत राहत होता. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता तो माेटारसायकलवरून तकिया मशिदीजवळून जात होता. यावेळी त्याचे नियंत्रण सुटले आणि तो खाली पडून गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दीपकला पोलिसांनी तातडीने जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, रात्री पावणेतीन वाजता त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात भरवेगात माेटारसायकल चालविताना अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. अपघाताची माहिती नंतर त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली होती.