मुंबई

भाजपाकडून संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सुरु - शरद पवार

प्रतिनिधी

संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्य प्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय झालं, तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजूला करून सत्ता आपल्या हातात कशी राहील, असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ताकेंद्रित झाली तर ती एका हातात जाते. केंद्रातील भाजप सरकारचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

राष्ट्रवादीची राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, “ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला अगोदर कधी माहीत नव्हत्या, त्या अलीकडे आले आहेत. ईडीचा काँग्रेसकडून कधी वापर झाला नाही; मात्र आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे. जनता बोलत नाही, ती बघत असते, निरीक्षण करत असते. आज देशातील अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही,” असा स्पष्ट इशाराच शरद पवार यांनी यावेळी दिला. 

“ओबीसी आरक्षणाच्या बाबत कोर्टाने निकाल दिला आहे. निवडणुकीत ज्यांनी अर्ज भरले आहेत, तिथे निवडणुका घ्या आणि भरले नाहीत तिथे घेऊ नका, असा निर्णय दिल्याचे कळतेय. त्यामुळे आता निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला घेऊन निवडणुका झाल्या पाहिजेत, ही पक्षाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही एक संधी आपल्याला आली आहे. त्यातून नगरपालिका, नगरपरिषद या सर्व पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहील,” असेही पवार म्हणाले. 

“पक्ष संघटना म्हणून आपल्याला कष्ट करायचा हा कालखंड आहे. पक्षाची स्थापना १९९९ला केली. आजपर्यंत पक्षाचा २३ वर्षांचा कालखंड झाला. यामध्ये साडेसतरा वर्षे सत्तेत आपण होतो. यामध्ये भाजपकडे किती वर्षे होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचा कालखंड सोडला, तर जास्त काळ भाजप सत्तेत नव्हता. आपण सत्ता बघितली आणि सत्ता नसलेला काळही बघत आहोत, त्यामध्ये मला समाधानाचा काळ हा विरोधात असताना वाटतो. सत्ता असताना अधिकार्‍यांची एक साखळी लक्षात येते; मात्र विरोधात असताना एखादा निर्णय घेतला असेन तर तो आपल्याला जाता-येताना पाहता येतो,” असे पवार यांनी सांगितले.

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!

ATMमधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्यास काय करायचं? काय सांगतो RBIचा नियम