शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काही महिन्यांपूर्वी वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला असा ३.५९ किमी सायकल ट्रॅक आणि बोर्ड वॉर्क बांधण्याचा प्रस्ताव मुंबई पालिकेसमोर मांडला होता. याला अखेर आता मुंबई पालिकेने मंजुरी दिली असून यासाठी तब्बल २१८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात, हा प्रस्ताव म्हणजे पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप करत विरोध केला होता.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर आहेच, याशिवाय मुंबईमध्ये अनेक जुनी पर्यटनस्थळेदेखील आहेत. जगभरातून अनेक पर्यटक मुंबईची प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी येत असतात. तसेच, मुंबईच्या तिन्ही बाजूला समुद्र किनारा लाभला आहे. यामुळेच, समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षणीय स्थळे उभारण्यात येणार आहे. यासाठी माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी २०२१च्या ऑगस्टमध्ये मुंबई महापालिकेकडे एक प्रस्ताव मांडण्यात आला. वांद्रे आणि माहीम या दोन किल्ल्यांदरम्यान समुद्रकिनाऱ्यालगत ३.५९ किमीचा सायकल ट्रॅक आणि बोर्ड वॉक बांधण्याचा प्रस्ताव होता. कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण अखेर १५ महिन्यांनंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.